सुलभ एकात्म मानव दर्शन – 05 -विनय पत्राळे



(मागील भागात भारतीय चिंतन थोडक्यात पाहिले. या भागात डार्विनच्या चार पायाभूत सिद्धांतापैकी Struggle for existence, Survival of the fittest हे दोन सिद्धांत व तुलनेने भारतीय विचार पाहूयात. डार्विनचे बाकी दोन सिद्धांत Exploitation of nature, Individual rights पुढील भागात)

अ) (Struggle for existence) अस्तित्वासाठी संघर्ष
डार्विनच्या उत्क्रांतीवादाचा हा प्रथम सोपान आहे. म्हणजे सृष्टीत सर्वत्र बळी तो कान पिळी हा न्याय डार्विनने पाहिला. त्याला सर्वत्र संघर्ष दिसला. शाकाहारी प्राणी झाडपाला खाऊन राहतात तर मांसाहारी प्राणी शाकाहारी प्राण्यांना खाऊन राहतात. अस्तित्वासाठी सर्वांनाच संघर्ष करावा लागतो. मोठा मासा लहान माशाला खाऊन आपली भूक भागवितो. मनुष्यामध्ये सुद्धा अधिक बलशाली दुर्बलांवर राज्य करतो. बलवान राष्ट्रे आपल्या वसाहती बनवतात व त्यांचे शोषण करून अधिकाधिक गब्बर होत जातात. त्यामुळे त्याने प्रथम सिद्धांत मांडला अस्तित्वासाठी संघर्ष!’
         भारतीय चिंतनानुसार सर्वत्र एकच ब्रह्म विद्यमान असल्यामुळे संघर्षाचा प्रश्नच निर्माण होत नाही. तर मग हा वरवरचा संघर्ष दिसण्याचे कारण काय? त्याचे कारण स्वतःच्या ख-या अस्तित्वाची ओळख नसणे हे आहे. एकदा जर का ही ओळख पटली, तर मग संघर्ष समाप्त होतो.
         समजा एखाद्या कार्यक्रमात अचानक वीज गेली व सर्वत्र अंधकार झाला तर सगळा गोंधळ उड़तो. इकड़े-तिकडे जात असताना कोणी दुस-यावर आदळला तर अंधारातच भांडण सुरू होते. भांडणाच्या दरम्यान अचानक वीज येऊन प्रकाश पडला तर सर्व लख्ख होते. लक्षात येते की अरे! हा तर आपला मित्रच! मग भांडण समाप्त होते.
         भारतीय चिंतन म्हणते की मायेच्या आवरणामुळे वरवर संघर्ष दिसतो. पण सत्याचा साक्षात्कार झाल्यानंतर हे आवरण वितळले की एकत्वाची अनुभूती होते.
डार्विनला मनुष्याच्या शरीर व मनामध्येसुद्धा संघर्ष दिसला. मनाची इच्छा खूप आवडता पदार्थ खायची असती तरी शरीर थोड्या वेळानंतर नाही म्हणू लागते. मना क्षणात इकडे तर क्षणात तिकडे जाते शरीराच्या गतीवर मर्यादा असते. त्यामुळे शरीर व मनातही संघर्ष आहे असे त्याला वाटते.
पण शरीरही माझे व मनही माझेच असा भाव पक्का असेल तर संघर्ष येत नाही. उलट मनाच्या संकल्पनांना शरीरसुद्धा साथ देते.
         ही एकतेची जाणीव येशू ख्रिस्तामध्ये आली तेव्हा त्यानी त्यांची हत्या करणा-याविषयी पण देवाकडे त्यांना क्षमा करण्याचेच मागणे मागितले. याच जाणीवेमुळे संत एकनाथ महाराजांनी रामेश्वराच्या अभिषेकासाठी कावडीतून आणलेले पाणी तहानेने तडफडत असलेल्या गाढवाच्या तोंडात ओतले.
         मनुष्याची आपलेपणाची जाणीव ही फार तर त्याच्या कुटुंबाविषयी अथवा त्यांच्या जातीपर्यंत विस्तारित होते. तिच्या कक्षा रुंदावत जेव्हा संपूर्ण सृष्टिशी एकाकार होतात तेव्हा मनुष्य ईश्वररूप होतो. त्यामुळे भारतीय चिंतन अस्तित्वासाठी संघर्ष या सिद्धांताशी सहमत नाही.

ब) (Survival of the fittest) शक्तिशालीचा विजय
मराठीत याला बळी तो कान पिळी असे म्हणतात. हिंदीमध्ये जिसकी लाठी उसकी भैंस अशी म्हण आहे. अस्तित्वासाठी संघर्ष झाल्यानंतर दुर्बळांचा नाश होईल व स्पर्धेत जो टिकेल, त्याचे अस्तित्व राहील असे हा नियम सांगतो.
               असे असल्यास वृद्ध, अपंग, गरीब, लहान मुले इत्यादींनी काय करावे. त्यांचे पोषण कोण करणार, की त्यांनी नष्ट व्हावे हेच योग्य आहे?
                भारतीय चिंतनास हे मान्य नाहीं. येथे सर्वे भवंतु सुखिनः सर्वे संतु निरामयाः ही प्रार्थना आहे. कमानेवाला खाएगा हा विचार वरवर चांगला वाटला तरी जन्मा है सो खायेगा, कमानेवाला खिलायेगा हा विचार अधिक उन्नत आहे. From each according to capacity  आणि To each according to need हे जास्त स्वीकारणीय आहे.
       समाजाचे सर्वात प्राथमिक स्वरूप म्हणजे आपला परिवार आहे. त्याला भांडवलशाहीचे सिद्धांत लावले तर घरातील वृद्ध अथवा मुले यांना जेवण मिळणार नाहीं व कमावणा-यांनाच ते मिळेल. सर्वांनी कम्युनिस्ट विचारांचे अवलंबन करायचे ठरवल्यास लहान थोर सर्वांना सारख्या संख्येने भाकर मिळेल. पण तो भारतीय परिवार असेल व जेवण कमी तयार झाले असेल तर घरातील वडीलधारी मंडळी म्हणतील, आज मुलांना पोटभर जेऊ द्या, आपल्याला उपाशी राहूनही चालेल.उद्याचे उद्या मग बघू!’ आपल्या या व्यवस्थेत दुर्बळ घटका विषयी अधिक सहानुभूतीपूर्वक विचार केलेला आहे.
      वनवासात असताना पांडव भिक्षा मागून आणत. कुंती त्या भिक्षेचे दोन भाग करीत असे. त्यातील अर्धा  वाटा भीमाचा काढून उर्वरित भाग चार पांडव, कुंती व द्रौपदी मिऴून वाटून घेत. पण कोणीही याचा विरोध केला नाही. कारण जंगलात येणा-या राक्षसांशी लढण्यासाठी अथवा चालून दमलेल्या कुंतीला खांद्यावर घेऊन चालण्यासाठी भीमाची शक्ती टिकून रहाणे ही पांडव परिवाराची आवश्यकता होती. त्यानुसार भिक्षेची वाटणी होत असे.
      थोडक्यात म्हणजे सृष्टिचक्रात सर्वच प्राण्यांचे पशु-पक्षी मानव यांचे स्वतःचे विशिष्ट स्थान असून त्यात सर्वांची कदर केली जाते. एखादी प्रजाती कमी अथवा नष्ट होत असेल तर त्याने करायचे काम राहून जाते. त्यामुळे Survival of the fittest पेक्षा सर्वे भवंतु सुखिनः सर्वे संतु निरामयाः हा भारताचा दृष्टिकोन आहे.   (पुढे क्रमशः)

भारतीय लोकशाहीतील राजेशाही - अनिल जवळेकर



श्री राहुल गांधीनी शेवटी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष व्हायचे ठरवले. एरवीही ते पद श्री राहुलजी शिवाय  कुणाला मिळणार नव्हतेच. भारतीय लोकशाहीची शोकांतिका येथेच म्हणावी लागेल. भारतीय लोकशाहीत राजेशाही राबवण्याचा प्रयोग भारतातील बहुतेक राजकीय पक्ष आणि त्यांचे राजकीय नेतृत्व करत आहेत असे म्हणणे भाग आहे. सर्व जग, त्यात भारतीय नव-स्वातंत्र्यवादीही आले, भारतीय लोकशाही यशस्वी झाल्याचे म्हणत असताना हा चिंतेचा विषय ठरावा. प्रश्न येतो तो हा कि मग निवडणूक नामांकन वगैरेची औपचारिकता तरी कशासाठी केली गेली?
              स्वातंत्र्यानंतर भारतीय नेतृत्वाने मोठ्या अभिमानाने संसदीय लोकशाही स्वीकारली व लोकांनी मताधिक्याने निवडून दिलेल्या नेतृत्वाकडून राज्यकारभार होईल अशी आशा बाळगली. राजकीय पक्ष उदय पावतील व ते लोकशाही हायजॅक करतील असे त्यांना वाटले असावे म्हणूनच कदाचित त्यांनी राजकीय पक्षांना राज्यघटनेत फारसे स्थान दिले नसावे. पण काळाला काही औरच मान्य होते. राजकीय पक्ष संख्येने उदंड झाले एवढेच नव्हे तर त्यांनी राजेशाहीतील घराणेशाही जिवंत ठेवली. भाजपा व साम्यवादी पक्ष सोडले तर बहुतेक पक्ष घराण्याशी जोडले असल्याचे चित्र आहे.
       एकात्म मानव दर्शनाचा विचार करतांना दीनदयाळजीनी राजकारण राष्ट्रनिर्माणासाठी करण्यावर भर दिला. राष्ट्रहितनिष्ठा ही सर्वोपरी व राजकीय निष्ठा ही दुय्यम असावी असा आग्रह धरला. आजचे भारतीय राजकारण राष्ट्रनिष्ठ असण्या एवजी व्यक्तीनिष्ठ व घराणेनिष्ठ होत चालले आहे असेच म्हणावे लागेल. राहुलजीचे पक्षाध्यक्ष होणे याला धरून आहे. पण यात फक्त कॉंग्रेस पक्षच आहे असे मानण्याचे कारण नाही. भाजपातही नेतृत्वात नसली तरी कार्यकर्त्यात घराणेशाही उतरत असल्याची उदाहरणे समोर येत आहेत हे लक्षात ठेवले पाहिजे.
       भारतीय लोकशाहीचे निवडणुका हे एक प्रमुख अंग आहे आणि निवडणुकात ग्रामपंचायत पासून लोकसभे पर्यंत घराणेशाहीची मक्तेदारी होणे धोक्याचे म्हणावे लागेल. यासाठी निवडणुकीच्या प्रक्रियेत व एकंदरच अभिशासन (Governance) यात बराच बदल होणे गरजेचे आहे. परिस्थिती सुधारण्यासाठी एकात्म मानव दर्शनाच्या प्रकाशात खालील बाबींचाही विचार केला पाहिजेः
1 केंद्र व प्रांत सरकारचा आकार व आवाका कमी करणे. सरकार करत असलेली अनेक कामें सामाजिक संघटनांनी करणे जशी ती पूर्वी आपल्या देशात केली जात होती उदा. शिक्षणसंस्था व आरोग्यसेवा चालवणे, किमान आवश्यक तेवढेच सरकारी उद्योग चालवणे, विकासकामांचे शक्य तितके ग्रामपंचायत व जिल्हा परिषदांकडे हस्तांतरण करणे, नव्या तंत्रज्ञानाचा व माहितीक्रांतीचा उपयोग करून उत्पादनांचे  विकेंद्रीकरण करणे इ.
2 राजकारणापलीकडे जाऊन समाजातील विद्वान, निस्वार्थी व राष्ट्रहितदक्ष लोकांची आचार्य परिषद बनवून त्याच्याकडून सल्ला घेत रहाणे
3 पक्ष, खासदारकी व मंत्रीपद इ. साठी 10 वर्षे ही कमाल मर्यादा ठरवणे
4 कोणतीही व्यक्ती ही पक्ष किंवा लोकप्रतिनिधित्व तसेच सामाजिक, आर्थिक वा धार्मिक केवळ एका पदावरच राहू शकेल. इतर सर्व पदांचा त्याग केला पाहिजे.
5 निवडणूक लढवण्यासाठी किमान शैक्षणिक पात्रता व अनुभव तसेच विषयप्राविण्याची पातऴी ठरविणे

वर्तणुकीचे अर्थशास्त्र - अनिल जवळेकर

अमेरिकेचे अर्थतज्ञ श्री रिचर्ड थेलर यांना त्यांनी वर्तणुकीच्या अर्थशास्त्रात केलेल्या कामगिरीबद्दल नुकतेच नोबेल पारितोषक देण्यात आले. आधुनिक पाश्चात्य अर्थशास्त्रात सामान्यपणे स्वार्थ साधण्याच्या वर्तणुकीला मान्यता आहे. अर्थव्यवहारातील मानव हा समजदारीने आपला स्वार्थ साधतो ह्या गृहितकावर अर्थशास्त्र उभे आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. थेलर ह्यांचे वर्तणुकीचे अर्थशास्त्र हे मानायला तयार नाही. त्यांच्या मते वास्तविक व्यवहारात मानव हा असा समजदारीने वागत नाही. बऱ्याच वेळा खूप पर्याय दिले तर त्याच्या हातून चूक होण्याचीच शक्यता असते म्हणून पर्याय देताना नीट विचार झाला पाहिजे. त्यातून इष्ट पर्यायाकडे लोकांना हळुवारपणे ढकलावे (nudging), अशाने लोक इष्ट निर्णय घेण्याची शक्यता वाढते असे मानणारे हे वर्तणुकीचे अर्थशास्त्र आहे. एका दृष्टीने भारतीय चिंतनाच्या काहीसा जवळ जाणारा हा पैलू आहे असे म्हणता येईल.

भारतीय चिंतन मानवाला पूर्णपणे स्वार्थाच्या आधीन मानत नाही तर अज्ञानाच्या आधीन मानते. अज्ञान दूर झाले तर मानव आपले हित जाणेल व तेच समाज धारणेत उपयोगी ठरेल. त्यामुळे अज्ञान दूर झाले पाहिजे व त्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे असा भारतीय चिंतनाचा आग्रह आहे. अर्थात अर्थशास्त्रात पर्यायांची माहिती पुरवली म्हणजे अज्ञान दूर होते व विक्रेत्याची जबाबदारी संपली असे मानले जाते व जाहिरातबाजीने मन कलुषित करण्याचा प्रयत्न केला जातो. भारतीय चिंतन ह्याच्या पुढे जाऊन व्यक्तीला समाजहिताची दृष्टी देते व समाज धारणेचा मार्ग खुला करते.

पाश्चिमात्य अर्थशास्त्र व्यक्तीला स्वार्थी बनवते व सरकार कडून समाजधारणेची व समाजहिताची अपेक्षा ठेवते. कंपन्यांना इच्छित निर्णय लोकांनी घ्यावेत यासाठी उपयोगी पडणारे वर्तणुकीचे अर्थशास्त्र समाजधारणेत तोटके पडण्याचीच जास्त शक्यता आहे. भारतीय मानसशास्त्राची जोड दिली तर कदाचित ते पूर्णत्वाला जाऊ शकेल. वर्तणूक प्रभावित करणे फक्त आर्थिक क्षेत्रातच आवश्यक नसते तर जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात महत्त्वाचे आहे हे मान्य व्हावे. आणि त्यासाठी मानव मानसिकदृष्ट्‍या प्रगल्भ होणे गरजेचे आहे जेणे करून व्यक्तिगत स्वार्थापेक्षा त्याला समाजहित महत्त्वाचे वाटले पाहिजे. यासाठी एकात्मतेची संकल्पना सतत पुढे ठेवली पाहिजे. व्यक्तिगत स्वार्थ साधल्याने मानव फक्त भोगवादी होत जाईल व ते समाज धारणेत बाधा टाकणारे असेल. एकात्मतेच्या जाणीवेतून आलेली प्रगल्भता सर्वांचे हित साधणारी असेल व समाजधारणेत उपयुक्त ठरेल असे म्हणता येते. वर्तणुकीचे अर्थशास्त्र भारतीय चिंतनाचा आधार घेत वाटचाल करेल तर ते निश्चित उपयोगी ठरेल असे वाटते.

सुलभ एकात्म मानव दर्शन – 04 (क्रमशः) -ले. विनय पत्राळे

3 भारतीय चिंतन

पृथ्वी वरील जीवन पाण्यात सुरू झाले. संस्कृत मध्ये पाण्यासाठी ‘जीवन’ हा शब्द आहे. त्यानंतर भूमीवर पशु, आकाशात पक्षी निर्माण झालेत. त्यांच्या पोषणासाठी निसर्गाने वनस्पती, धन-धान्य, फळे-फुले इत्यादि आधीच निर्माण करून ठेवलेले होते. प्रगतीच्या एका टप्प्यावर मनुष्याचा उद्भव झाला. मनुष्याचे प्रारंभिक जीवन पशुसमान होते. त्यानंतर तो शेती करू लागला. स्थिर जीवन जगू लागला. भाषा जन्माला आली. संस्कृती उदयास आली. मनुष्य विचार करू लागला. सर्वात मूलभूत प्रश्न त्याच्या मनात निर्माण झाले. ते म्हणजे

1 ‘कोSहं’ मी कोण आहे?

2 कुतः आगतः? मी कोठून आलो आहे?

3 मला कोठे जायचे आहे?

4 हे पशु-पक्षी वनस्पति.. सारे कोठून आले व कोठे जाणार आहेत?

5 मी व ही सभोवतालची सृष्टि यांचा परस्परांशी काय संबंध आहे?

जगात सर्वप्रथम भारतीय मनीषींनी या प्रश्नांच्या उत्तराच्या दिशेने शोध घ्यायला प्रारंभ केला. अदृष्टाचा शोध! त्यांच्या ध्यानात आले की जशी रचना, जशा व्यवस्था आपल्यामध्ये आहेत, तशीच रचना बाहेरच्या विश्वात सुद्धा आहे. त्यांना त्यामध्ये अद्भुत साम्य आढळले. मनुष्याच्या शरीरात जसे रुधिराभिसरण, अन्नपचन, श्वासप्रश्वास अशी चक्रे आहेत त्याचप्रमाणे निसर्गात सुद्धा परस्परावलंबी आणि परस्परपूरक अशी चक्रे आहेत. मनुष्य आणि इतर पशु-पक्षी प्राणवायू घेतात व कर्बाम्ल वायु सोडतात तर वनस्पती कर्बाम्ल वायू घेतात व प्राणवायू मुक्त करतात. मनुष्याचे शरीर वनस्पतीचा झाडपाला खाऊन संवर्धित होते तर तेच शरीर मृत झाल्यानंतर व कुजल्यानंतर वनस्पतीचा आहार होते. निसर्गाची ही चक्रे आपसात व्यवस्थित गुंतलेली आहेत. एकाच महाकाय यंत्राचे घटक असल्यासारखी ही चक्रे आपसात एकदुस-याच्या लयीमध्ये फिरत असतात. यातील एखादे सुद्धा चक्र निसटले तर निसर्गाची गती अडखळते. लहानशा अमीबापासून तर महाकाय प्राण्यापर्यंत एक सुव्यवस्थित रचना आहे. त्याला त्यांनी नाव दिले ‘यत्पिंडे तद् ब्रह्मांडे’

अणुकेंद्रात व अणुकेंद्राच्या सभोवती फिरणा-या सूक्ष्म घटकांपासून तर प्रचंड ग्रहगोलांच्या गतिपर्यंत सर्वत्र एक लयबद्धता आहे. ही लयबद्धता एकाच शक्तिचे स्पंदन अभिव्यक्त करत असते. ती शक्ती सर्वव्यापी आहे. ती सर्वसाक्षी आहे. संपूर्ण विश्व त्या सतत प्रसरण पावणा-या ब्रह्माचीच अभिव्यक्ती आहे. त्याशिवाय दुसरे काहीही नाही. तेच सर्वत्र स्थूल व सूक्ष्म स्वरुपात आहे. ‘सर्वं खल्विदं ब्रह्म’

अग्निच्या ठिणग्या सर्वत्र पसराव्यात तसे चैतन्याचे आविष्कार सर्वत्र पसरलेले आहेत. ते सर्व प्राणीमात्र वनस्पती आणि तथाकथित निर्जीव वस्तुंमध्ये सुद्धा असतातच. त्या एकतेची अनुभूती करणे हे जीवनाचे परम लक्ष्य आहे. या लक्ष्याला त्यांनी मोक्ष हे नाव दिले.

या दृष्टिकोनातून भारतीय ऋषींनी सर्वत्र पहायला सुरुवात केली. सर्व प्रश्नांचा व समस्यांचा विचार याच दृष्टिकोनातून केला. ‘एकात्म’ भावनेतून चिंतन करीत असताना जे भोवतालच्या सृष्टीशी तदाकार झालेत त्यांना अनुभूती झाली. ह्या अद्भुत एकत्वाचा अनुभव घेतलेले आधुनिक महर्षी म्हणजे स्वामी विवेकानंद! श्री रामकृष्णांनी स्पर्श केल्याबरोबर आजूबाजूचे सर्व विश्व एकाच शून्यात विरघळून जात असल्याची त्यांना अनुभूति झाली. अशा अनुभवासाठीची आध्यात्मिक सिद्धता त्या वेळी नसल्यामुळे ते चक्कर येऊन खाली पडले. त्यानंतर त्यांनी अनेकदा हा अनुभव वर्णन करून सांगितला. पुढे भविष्यात केवळ स्पर्शाने इतरांना अशा प्रकारचा अनुभव देण्याची सिद्धी त्यांच्यात आली.

पाश्चिमात्य जगताने सर्व बाबींचा तुकड्या-तुकड्यांत विचार केला. त्यात खोलवर जाऊन प्रत्येक तुकड़ा भिन्न आहे असे समजून त्याला तपासले. त्यामुळे पश्चिमी जगात ‘स्पेशालिस्ट’ निर्माण झालेत. उदाहरणार्थ आरोग्य क्षेत्रात डोळ्यांचा डॉक्टर वेगळा, दातांचा वेगळा, नाक-कानांचा वेगळा, हाडे जोडणारा वेगळा, चामडीचा वेगळा... शरीराचा वेगळा आणि मनोजन्य रोगांचा वेगळा.

भारताने सर्व चिंतन ‘सर्वं खलु इदं ब्रह्म’ या सूत्रावर आधारित केले. त्यामुळे त्यात व पाश्चिमात्य चिंतनात काही मूलभूत फरक दिसतात. पश्चिमी जगताचे चिंतन डार्विनच्या उत्क्रांतीवादावर आधारित आहे. त्याचे चार पायाभूत सिद्धांत व त्याच्या जोडीला त्याच संदर्भातील भारतीय विचार, असे आपण टप्प्याटप्प्याने पुढे जाऊ.

(पुढे क्रमशः डार्विनचे चार पायाभूत सिद्धांत Struggle for existence, Survival of the fittest, Exploitation of nature, Individual rights)

हे असे एकात्म मानव दर्शन ------ कविः डॉ अभिजित फडणीस

साम्यवादाचा फुगा फुटला
भांडवलशाहीला सामान्य विटला
आता हवे पर्यायी चिंतन
देते आम्हा एकात्म मानव दर्शन

भांडवलशाहीतून स्वार्थ निपजला
साम्यवादाने मनुष्य चिरडला
आमच्या ऋषींचे विचार चिरंतन
त्यावर आधारित एकात्म मानव दर्शन

समाजाची त्यांनी रचना केली
अधिकारांची विभागणी केली
दायित्व अधिकारांहून महान
हेच खरे एकात्म मानव दर्शन

धर्मज्ञान आहे तिथे सत्ता नको
सत्ता आहे तिथे स्वार्थ नको
पैसा  आहे तिथे समाजाची जाण
हेच खरे एकात्म मानव दर्शन

गुण-कर्म जरी प्रत्येकाचे वेगळे असे
ध्येय मात्र सर्वांचे एकच जसे
श्रमाश्रमातून समाज उन्नयन
हेच खरे एकात्म मानव दर्शन

जाती पाती वर्ण आणि पंथभेद
वरवरती दिसती, अंतर्यामी एकजीव
अवयव अनेक, तरी एकत्र संजीवन
हेच खरे एकात्म मानव दर्शन

मानवाच्या भोगासाठी सृष्टी
समजूत इहवादाची खोटी
कंकरात ईश्वरी अधिष्ठान
हेच खरे एकात्म मानव दर्शन
केवळ स्वार्थ नसे जीवनमूल्य
अधिकारांपेक्षा कर्तव्याला मोल
प्रत्येक कृतीतून विश्वस्पंदन
हेच खरे एकात्म मानव दर्शन

मानव नसे केवळ पशूमात्र
दिव्यत्वाचा त्याला स्पर्श
करू त्याचे सम्यक जागरण
हेच खरे एकात्म मानव दर्शन

घेण्याचा नको देण्याचा विचार
व्यष्टीचाच नको समष्टीचा विचार 
सृष्टी आणि परमेष्टी चिरंतन
हेच खरे एकात्म मानव दर्शन

एकात्मता बंधुत्वाहून श्रेष्ठ
अद्वैत द्वैताहून वरिष्ठ
भावनिक ऐक्याचे प्रतिपादन
हेच खरे एकात्म मानव दर्शन

पददलितांचे उत्थान साधूया
परदुःखातच आपले दुःख पाहूया
जनताजनार्दन म्हणजे नारायण
हेच खरे एकात्म मानव दर्शन
पंथ निरपेक्षता हवी साची
ईश्वराची भक्ती यथामती
पण राष्ट्राला धर्माचे अधिष्ठान
हेच खरे एकात्म मानव दर्शन

धर्म म्हणजे राष्ट्राची चिती
विराट राष्ट्राची संस्कृती
चिती  आणि विराटाचे जागरण 
हेच खरे एकात्म मानव दर्शन
राजसत्तेची इतिकर्तव्ये अनेक
व्यक्तीचे उत्थान समाजधारणा नेक
प्रजेचे स्वपुत्रवत पालन
हेच खरे एकात्म मानव दर्शन

शिक्षण नसे केवळ पुस्तकी ज्ञान
आंतरिक क्षमतांचे त्यात विकसन
व्यक्ती बने राष्ट्रीय सद्गुणांची खाण
हेच खरे एकात्म मानव दर्शन

कायद्यापेक्षा स्वयंशिस्त श्रेष्ठ
संस्काराने नराचा नारायण हे उद्दिष्ट
जीवनाचं आमूलाग्र परिवर्तन
हेच खरे एकात्म मानव दर्शन

कलहापेक्षा प्रेम आणि अवलंबित्व
पश्चिम नि भारतीय विचार भिन्नत्व
वैविध्यता एकत्व सूत्र बंधन
हेच खरे एकात्म मानव दर्शन

विसंवाद नको संवाद हवा,
युद्ध नको बंधुभाव हवा
त्या साठी सबळ राष्ट्र निर्माण
हेच एकात्म मानव दर्शन

काम, क्रोध ह्रासाला कारण,
प्रेम आणि त्याग सत्वाचे जागरण
मैं नही तू ही विचार संवर्धन
हेच एकात्म मानव दर्शन

व्यक्तीचा विचार नको अर्धवट :
शरीर, मन, बुद्धी, आत्मा यांचा हा घट
या साऱ्यांचे सम्यक चिंतन
हेच एकात्म मानव दर्शन

धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष
चारी पुरुषार्थांची सांगड श्रेष्ठ
धर्माचे महत्व अनन्य साधारण
हेच एकात्म मानव दर्शन

धर्म राज्याहुन ही श्रेष्ठ
धर्म म्हणजे पंथ नव्हे जाण
धर्म राष्ट्राचालनाचा प्राण
हेच एकात्म मानव दर्शन

राजशक्ती अतिरेक, तर धर्माचा क्षय
हेच साम्यवादाच्या ह्रासाचे कारण
समाजाभिमुख व्यक्तीचे निर्माण,
हेच एकात्म मानव दर्शन

राज्यशक्ती आणि राष्ट्र आहेत भिन्न
पश्चिमेने केली गल्लत समान लेखून
राज्य अस्थायी, राष्ट्रशक्ती असे चिरंतन
हेच एकात्म मानव दर्शन

जन्मलेल्या अन्न हवे,
कमवेल त्याने द्यायला हवे
वसुधैव कुटुंबाची जाण
हेच एकात्म मानव दर्शन

मनुष्य घटक नसे केवळ आर्थिक
'
जीवो ब्रहमैव ना परः' ऐक्य उत्कट
करूया त्याला नराचा नारायण
हेच एकात्म मानव दर्शन

स्वदेशी, विकेंद्रीकरणावर भर
तंत्रज्ञानाबरोबर मानवीय विचार
स्वार्थ नव्हे, अंत्योदयाचा निर्धार
हेच एकात्म मानव दर्शन
(एकात्म मानव दर्शन संमेलन ठाणे 24.9.2017)