शेतमालाला भाव, तूरखरेदी आणि नेत्यांची चिखलफेक - प्रमोद क्षीरसागर


शेती क्षेत्राची स्थिति मुकी बिचारी कुणी हाका अशी झाली आहे. जो तो उठतो आणि जणु आपल्यालाच समस्येवर  तोडगा माहिती आहे अशा आविर्भावात वावरताना काही काळ तरी दिसतो. पण व्यावहारिकतेच्या दगडावर डोके आपटणार असे लक्षात येताच थातूरमातूर कारणे सांगून इतरांच्यावर ठेपर ठेवून मोकळा होतो.
         शासन, प्रशासन, बँका, व्यापारी, मजूर, वाहतूक हे सर्वजण संघटित आहेत. स्वतःच्या हितसंबंधांची जपणूक करण्यास ते सक्षम आहेत. शेतकरी व ग्राहक हे दोघही असंघटित आहेत. प्रसंगी ते कधी संघर्ष, आंदोलन, वाटाघाटी यासाठी संघटित होत असतील. पण अन्यथा नाही. त्यामुळे स्वाभाविक पणे संघटित घटक दुर्बळांवर म्हणजे शेतकरी व ग्राहकांवर कुरघोडी करतात.
         शासनाने या वेळेस भरपूर तूरखरेदी केली पण प्रश्न सुटला नाही. भाव कमी म्हणून शेतकरीवर्ग विरोधात, शासन आपल्या व्यापारात ढवळाढवळ करते म्हणून तटस्थ राहून व्यापारी वर्ग विरोधात आणि ग्राहकसुद्धा भाव कमी म्हणून फार काही जास्त खरेदी करत नाही म्हणजे सगळेच उदासीन. शासनाचे पैसे अडकले. जनतेला कौतुक नाही. तेल गेले तुप गेले हाती आले धुपाटणे अशी शासनाची स्थिती बर्‍याच वेळा होत आहे. मग दोनही बाजूची नेते मंडळी पण उखाळ्यापाखाळ्या काढण्यातच फुशारकी मानतात. मूळ समस्या जशीच्या तशीच रहाते. शासनाने ठरविले तर बाजारावर नियंत्रण प्रभावीपणे कसे होऊ शकते याची अमूलचे धारा तेल व आताचे कृषि बाजार समितीच्या जोखडातून शेतकऱ्यांची सुटका ही दोन उदाहरणे आहेत. पण बहुधा व्यापाऱ्यांची धनशक्ती शासनाच्या प्रशासनिक अंमलबजावणीच्या इच्छाशक्तीपेक्षा अधिक प्रभावी असतेच.
         वरील दोन्ही उदाहरणे ही तेलसम्राटांना नमविण्यासाठी व राजकीय डावपेचात मात करण्यासाठी होती. यात तात्कालिक यश मिळाले. शेतकरी व ग्राहक तसेच या क्षेत्रातील इतर सर्व लाभधारक यांचा विचार झाला पाहिजे.. समाजातील सर्व संबंधित घटकांचे सुयोग्य हित साधण्यासाठी सहयोग आणि सहअस्तित्व या तत्त्वांवरच आधारित रचना - वातावरण करण्यासाठी पोषक मूल्ये पं. दीनदयाल उपाध्याय यांच्या चिंतनात समाविष्ट आहेत. भारतीय जनसंघाने दिल्ली नगर निगम हातात आल्यावर बाजारात विकला जाणारा दहा पैसे थंड पाण्याचा ग्लास सर्व घटकांना एकत्रित बोलावणे करुन सहा पैसे इतका कमी केला. जाचक अटी, कामकाजातील अडथळे कमी होऊन तसेच करांची पुनर्रचना यामुळे पोषक वातावरण निर्माण झाले. जनमत पण शासनानुकूल झाले. सर्वांच्या एकूण उत्पन्नात वाढ झाली.       
         तूर या विषयातही समग्र व एकात्म विचार केल्यास नवीन उपाय समोर येऊ शकतात. उदा.१ प्रत्येक शेतक-याकडे त्याची स्वतःची कमी खर्चाची भंडारण क्षमता या तंत्रज्ञानाच्या युगात का होऊ नये? पूर्वीही घरात पेव असावयाचे. २  परोपकारी संस्थाना आवाहन केल्यास व त्यांना काही कायद्याचे पाठबळ दिल्यास त्या संस्था लोकहितासाठी भंडारण व्यवस्था अनेक  गावांत उभारू शकतील. हे धर्मादाय काम होईल.
             पं. दीनदयाल उपाध्याय यांचे एकात्म मानव दर्शन उत्पन्न, उत्पादन, उत्पादकता, भंडारण, श्रमप्रतिष्ठा, मूल्य निर्धारण,सर्वहितसमन्वयाची आवश्यकता यावर मार्गदर्शन करते.

No comments:

Post a Comment