सुलभ एकात्म मानव दर्शन – 02 (क्रमशः) -ले. विनय पत्राळे



पाश्चिमात्य विचार ....

धर्म - संप्रदाय
         भारतामध्ये धर्म हा स्वतःचे मूळ सत्यस्वरूप ओळखण्यासाठीचे माध्यम म्हणून प्रगट झाला. त्यामुळे तो व्यक्तिगत आचरणाचा भाग बनला. त्याने अनुभूतिलाच प्रमाण मानले. शंकराचार्य म्हणतात की चारही वेद मिळून सांगत असतील की अग्नि शीतल आहे व तुमचा अनुभव सांगत असेल की अग्नि उष्ण आहे, तर तुम्ही तुमचा अनुभव प्रमाण माना व पुस्तकातल्या मान्यतांना नकार द्या. विवेकानंद म्हणाले की धर्म म्हणजे तुम्हाला अनुभूति करून देण्याची ताकत असलेली व्यवस्था. (Doctrines, dogmas, books, rituals, temples, images are all secondary details… ). भारताने धर्माची ही व्याख्या जोपासली. पाश्चिमात्य जगताने सेकंडरी डिटेल्स पकडून ठेवलेत.
         पाश्चिमात्य जगतात धर्माचे सेमेटिक धर्म (मजहब) म्हणजेच निश्चित पूजापद्धतीचा आग्रही समुदाय असे स्वरूप अस्तित्वात आले. त्याची व्यवस्थित जोपासना करण्यात आली. आपल्या समूहाची संख्या वाढविणे हे सर्वात पुण्याचे काम समजले गेले. संख्या वाढविण्यासाठी स्वतःची पूजापद्धती अमान्य असणा-यांच्या कत्तली करण्यापासून तर त्यांना जबरदस्ती अथवा लालूच दाखवून स्वतःच्या संप्रदायात ओढण्याचे काम अत्यंत पवित्र धार्मिक कर्तव्य मानले जाऊ लागले.
         वास्तविक अशा प्रकारच्या व्यवस्थांना संप्रदाय किंवा मजहब म्हणता येईल त्यांना धर्म मानणे चुकीचे आहे. निश्चित प्रेषित, निश्चित मजहबी पुस्तक, निश्चित प्रार्थनास्थळ, निश्चित कर्मकांड... इत्यादींचा समुच्चय म्हणजे मजहब...! पाश्चिमात्य जगात असले मजहब विकसित झालेत. त्यांचा साम्राज्यवाद वाढवण्यासाठीचे हत्यार म्हणून उपयोग केला गेला. यूरोपीय देशात झालेल्या क्रूसेड लढाया या अशाच मजहबी प्रस्थापनेसाठी लढलेल्या आहेत.
          भविष्यात अशा मजहबी धुरीणांच्या हातात प्रचंड सत्ता एकवटली गेली. पोप हा या सत्तेचा प्रमुख मानला गेला.
          कालांतराने पोपची सत्ता व राजकीय सत्ता यात संघर्ष सुरू झाला. रोजच्या वहीवटीमध्ये पोपची लुडबूड राजसत्तेला अस्वस्थ करू लागली. त्याविरुद्ध राजसत्तेने आव्हान पुकारले. त्यातून राज्य सेक्युलर असावे असा विचार समोर आला. म्हणचे ऐहिक भौतिक बाबतीत निर्णयाची पूर्ण सत्ता राज्याकडे असावी व पोपचा त्यात हस्तक्षेप चालवून घेतला जाणार नाही हा विचार प्रस्तुत झाला.

थियोक्रेटिक स्टेट 
उपरोक्त संघर्षात काही राजसत्तांनी स्वतःचा अधिकृत राजधर्म घोषित केला. म्हणजे सत्तेने एकाच प्रकारच्या संप्रदायाला आपले संरक्षण घोषित केले. स्वाभाविकच अन्य संप्रदायाला मानणारे लोक हे दुय्यम दर्जाचे नागरिक समजले गेले. त्यांची उपेक्षा होऊ लागली. त्यांचा राज्यसत्तेद्वारा छळ होऊ लागला. राजसत्तेने आश्रय दिलेल्या संप्रदायाला शरण जाणे- हा एकमात्र मार्ग त्यांच्यासमोर उरला.
           भारतामधे अशा प्रकारे थियोक्रेटिक स्टेट कधीच नव्हते. अपवाद म्हणायाला सम्राट अशोकाने  केलेला प्रयोग म्हणता येईल. अशोकाने बौद्ध संप्रदायाला राज्याचा अधिकृत संप्रदाय म्हणून घोषित केले. पण त्या संप्रदायाचा प्राणच अहिंसा असल्यामुळे रक्ताचे पाट वाहवून त्याचा प्रचार करणे हे कल्पनेच्या पलीकडले होते.
           आज भारतात रिलीजन (religion)चे भाषांतर धर्म असे केल्याने बराच भ्रम निर्माण झाला आहे. स्वतःची संख्या आक्रमकपणे वाढविणे ह्या संप्रदायाच्या अट्टाहासाचा सामना भारताला ही करावा लागत आहे. मूळतः धर्म या शब्दाची भारतीय संकल्पना आपण पुढे पाहूच पण त्या पूर्वी व्यक्ती आणि समाज यांच्या संबंधांचे पाश्चिमात्य जगताने कसे विश्लेषण केले त्याक़डे एक दृष्टिक्षेप टाकू या.

व्यक्ती आणि समाज
मनुष्य व अन्य प्राणी, पक्षी यात महत्वाचा फरक असा आहे की पशु-पक्षी उपजत-बुद्धिने जगतात आणि मनुष्य उपजत-बुद्धीच्या गुलामीतून बाहेर निघालेला आहे. मनुष्याचे जगणे हे त्याच्या बुद्धिपूर्वक केलेल्या निर्णयावर अवलंबून असते. पशु स्वभावानुसार वागतो. त्यामुळे त्याला ऊर्ध्वगती अथवा निम्नगती नसते. बैलाला कोणी महाबैल म्हणून सन्मान देत नाही तर वाघाची क्रूर वाघ म्हणून संभावना होत नाही. तो त्याच्या स्वभावधर्मानुसार नैसर्गिक वागतो व हे त्याचे वागणे सर्वसंमत असते.
           मनुष्याचे असे नाहीं. त्याच्यासाठी दोन्ही दिशा मोकळ्या आहेत. तो सामान्य मनुष्यातून नरोत्तम होऊ शकतो. त्यापेक्षा अधिक उन्नत होऊन नराचा नारायणसुद्धा होऊ शकतो. तशीच त्याला निम्नगती खाली खेचू शकते. तो सामान्य नराचा नरपशु होऊ शकतो. त्यापेक्षा अधिक पतित होऊन नराधम अथवा नरराक्षस सुद्धा होऊ शकतो.
            इतर पशूंना जीवनाचा उद्देश नसतो. पोट भरणे हाच त्यांचा केंद्रबिंदु असतो. मनुष्याला केवळ पोट भरणे पुरेसे नसते. त्याला स्वातंत्र्य हवे असते. त्याला आकांक्षा असतात. त्याला इतरांवर वर्चस्व गाजवायचे असते. त्याला संग्रह करून भविष्य सुरक्षित करायचे असते. पण हे सर्व तो एकटा करू शकत नाही. साधा अन्नाचा एक घास खायचा म्हटला तरी कितीतरी जणांचे हात लागल्याशिवाय तो पोंटापर्यंत पोचत नाहीं. त्यामुळे मनुष्याला स्वातंत्र्य प्रिय असले तरी त्यावर मर्यादा येतात.
            रस्त्याने चालण्याचे स्वतंत्र असले तरी इतरांना धक्के मारून वाटेल तसे चालता येत नाहीं. चालताना काही नियमांचे पालन करावे लागते.
            प्रत्येकाच्या क्षमता भिन्न असतात. त्या क्षमतानुसार त्याची संपत्ती निर्माण करण्याची ताकद असते. निर्माण केलेल्या संपत्तीचा उपयोग फक्त स्वतःसाठी करण्याची इच्छा असते. पण त्याला समाजाचाही वाटा काढावा लागतो. तो काढण्याची इच्छा कमी असते. त्यातून व्यक्तीला केंद्रात ठेऊन रचना करावी की समाजाला केंद्रस्थानी मानून रचना करावी हा विवादाचा विषय होतो. व्यक्तीला केंद्रस्थानी मानले तर ती हळूहळू शोषक होते. इतरावर अन्याय करते. तसेच समाजाला केंद्रस्थानी मानल्यास व्यक्तिगत पुढाकार कमी होतो.
            व्यक्तिगत स्वतंत्रता व समाजाची अनिवार्यता यामधे संतुलन करावे लागते. कोणताही अति वाइटच. सुवर्णमध्य साधण्याची व्यवस्था ही दीर्घाकाळ टिकणारी असते. त्यासाठी व्यक्ती व समाज यांचे नाते कसे असावे हे महत्त्वाचे ठरते. या नात्यामुळे दोन्ही बाबतीत सेतु निर्माण होऊ शकतो. उदाहरणार्थ फ्रेंच राज्य क्रातीचे सूत्र होते स्वातंत्र्य, समता व बंधुता. यामधे स्वातंत्र्य हे अधिकांश व्यक्तीशी संबंधित तर समता ही समाजाशी निगडीत आहे. दोन्हीमधे दुवा साधायचा असेल, तर बंधुता हे आवश्यक सूत्र आहे
(क्रमशः पुढील भागात - भांडवलशाही हा व्यक्तिवादाचा अतिरेक तर समाजवाद सामुहिकतेचा अतिरेक)
 

1 comment:

  1. खरतर भारताची धर्म कल्पना यावर आधिक विवेचन होण्याची आवश्यक्ता आहे. धर्म हा भारतीय जिवनाचा भाग कसा आहे, मानवाच्या सौख्यासाठी, व समाजाच्या स्वास्थ्यासाठी आमच्या पूर्वजांनी जिवन आणि धर्म याची कशी सांगड घातली, याची काही उदाहरणे हवीत. त्याचा परिणाम म्हणून आमचे भारतिय समाजमन कसे घडले आहे व नूतन भारताच्या अभ्यूदयाचा आराखडा समोर मांडतांना एकात्म मानव या तत्वज्ञानाचा व्यवहारात उपयोग कसा करावा याचे मार्गदर्शन पुढे व्हावे ही अपेक्षा.

    ReplyDelete