देशानुकूल आणि युगानुकूल -प्रा. श्यामकांत अत्रे

टाइम्स ऑफ इंडियाच्या 30 जून 2017च्या अंकात बातमी वाचली की उत्तराखंडच्या भाजप सरकारने आपल्या 18,000 सरकारी शाळांतून शिक्षणाचे माध्यम हिंदीऐवजी इंग्रजी करण्याचे ठरविले आहे. सन 2018 पासून या निर्णयाची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी होईल. स्वाभाविकच प्रश्न पडतो की अशी उलटी गंगा वाहविण्याची बुद्धी का होते?

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सत्तर वर्षांनीही भारतीय जनमानसात स्थूलमानाने दोन विचार प्रवाह आढळून येतात. एक प्रवाह हा ब्रिटीश राजवटीत त्यांनी राबविलेल्या कूटनीतीमुळे व व्यूहरचनेमुळे प्रभावित झालेला दिसतो. ही कूटनीती म्हणजे ब्रिटीशांनी विचारपूर्वक व योजनापूर्वक राबविलेले वसाहतीकरणाचे (colonization) चे सर्वंकष धोरण. त्याचे बीजारोपण त्यांनी दोनशे वर्षापूर्वी केले आणि त्यातून समाजजीवनाचे व राष्ट्रजीवनाचे कोणतेच क्षेत्र सुटलेले दिसत नाही. (ब्रिटिशांच्या यां सर्वंकष वसाहतीकरणाच्या बहुआयामी धोरणाचा येथील जनजीवनावर व भारतीय जनमानसावर झालेल्या खोलवर परिणामाचा लेखाजोखा घेणे हा स्वतंत्र लेखाचा विषय आहे) या वसाहतीकरणाच्या प्रक्रियेचे एक प्रमुख व महत्त्वाचे साधन म्हणजे त्यांनी या देशात रुजविलेली शिक्षण पद्धती. ‘इंग्रजी भाषेतून दिले जाणारे पाश्चत्य विद्यांचे शिक्षण’, हे त्या मेकॉले प्रणीत शैक्षणिक धोरणाचे मुख्य सूत्र होते. शिक्षणाच्या माध्यमातून त्यांना भारतीयांचा जीवन विषयक दृष्टिकोन, त्यांची मानसिकताच पूर्णपणे बदलून टाकावयाची होती. त्यांना भारतीय समाजातच ‘ब्रिटीश मानसिकतेचा काळा इंग्रज’ इथे निर्माण करावयाचा होता. आणि त्यात ते बऱ्याच अंशी यशस्वी झालेले दिसतात.

इंग्रजी भाषा, त्या भाषेतून दिले जाणारे पाश्चात्य विद्या व विचारविश्वाचे शिक्षण यांचा मोठा परिणाम व प्रभाव येथील सुशिक्षितांवर पडलेला दिसतो. ‘जे जे भारतीय ते ते कालबाह्य व टाकावू’ हा विचार या नवशिक्षितांच्या मनावर ठसविण्यात ही शिक्षणपद्धती बव्हंशी यशस्वी झालेली दिसते. त्यामुळे येथील विचारवंतांना भारताकडे, भारतीय प्रश्नांकडे ‘पाश्चात्य चष्म्यातून’ व ‘अभारतीय’ दृष्टीकोनातून पहाण्याची सवय लागली. प्रश्न या देशातील सांस्कृतिक, सामाजिक पर्यावरणातील, पण त्यांची उत्तरे शोधण्याची दृष्टी मात्र परकीय, असा हा वैचारिक गुंता होता. अशा मानसिकतेतूनच वर उल्लेखिलेला हिंदीऐवजी इंग्रजी हा निर्णय आलेला दिसतो.

स्वातंत्र्योत्तर काळात येथील राज्यकर्त्यांनी ब्रिटीश मानसिकतेमुळे सर्वसाधारण ध्येयधोरणे व कृतिकार्यक्रम ‘मागील पानावरून पुढे चालू’ या पद्धतीने अनुसरली.. त्यामुळे The Britishers left India, but their legacy continues’ असे चित्र यां देशात तयार झाले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर टप्प्याटप्प्याने भारताचे निर्वसाहतीकरण (Decolonization) करणे आवश्यक आहे, अशी भूमिका तत्कालीन राज्यकर्त्यांनी घेतली असती, तर भारतीय प्रश्नांकडे अभारतीय दृष्टीकोनातून पाहण्याची सुशिक्षित भारतीयांची मानसिकता हळूहळू बदलली असती. परंतु तशी जाण नव्हती व त्या दृष्टीने धोरणात्मक निर्णय घेतले गेले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. निर्वसाहतीकरण म्हणजे भारतीयीकरणाकडे वाटचाल. भारताकडे, भारतीय समस्यांकडे भारतीय दृष्टीकोनातून पहाणे त्यांचा विचार करणे व त्यावर उत्तरे शोधणे.

याचा अर्थ जे जे पाश्चात्य किंवा भारताबाहेरचे ते ते टाकावू, असेही नव्हे. त्यांच्या विचाराविश्वातही सत्यांश व सत्वांश असू शकतो. पण तो स्वीकारताना व आत्मसात करताना त्याचे भारतीयीकरण करणे आवश्यक आहे. यां भारातीयीकरणाचे ‘सूत्र’ पं. दीनदयाळ उपाध्याय यांनी आपल्या ‘एकात्म मानव दर्शन’ यां प्रबंधात ग्रथित केले आहे. जे जे तत्त्वज्ञान वा राजकीय व सामाजिक चिंतन अन्य देशात विकसित झाले ते ते देशानुकूल करून घेणे यां प्रक्रियेवर त्यांनी भर दिला. या देशाच्या सांस्कृतिक पर्यावरणाला अनुकूल व उपयुक्त अशी त्या विचारविश्वाची पुनर्मांडणी करून त्याची सांधेजोड या देशाशी व या देशातील जमिनीवरील वास्तवाशी करून घेणे दीनदयाळजींना अभिप्रेत होते. यां देशातील जनमानस, तत्त्वज्ञान, प्राचीन विचारसंचित व सांस्कृतिक पर्यावरण यांच्याशी सुसंगत व पूरक अशी ही पुनर्मांडणीची प्रक्रिया असली पाहिजे. समाजातील वैचारिक व बौद्धिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या विचारवंतांनी या प्रक्रियेत पुढाकार घेतला पाहिजे. हे दीनदयाळजींना अभिप्रेत होते आणि तेच आपल्यासमोरील खरे आव्हान आहे.

आपल्या देशातील समाजजीवनात दिसून येणारी दुसरी मानसिकता म्हणजे परंपरेने जे ज्ञान व विचारसंचित या देशात चालत आहे आहे ते अगदी स्वयंपूर्ण व परिपूर्णही आहे असे मानणे. त्याचे पुनरुज्जीवन हेच या देशाला तारणारे आहे व या देशाची प्रगती साधणारे आहे. आम्हाला नव्याने काही शिकण्याची गरज नाही; यां प्राचीन ज्ञान भांडारात आमच्या समोरील सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत असा आत्मसंतुष्टतेचा भाव या मानसिकतेच्या मंडळीत – समाजघटकात – दिसून येतो. या गतानुगतिक मानसिकतेचाही विचार दीनदयाळजींनी आपल्या प्रबंधात केला आहे. यां मानसिकतेत बदल घडवून आणण्यासाठी त्यांनी सूत्ररूपाने मांडणी करून मार्गदर्शन केले आहे. ते म्हणतात, “जे जे पूर्व परंपरेने या देशात चालत आले आहे ते ‘युगानुकूल’ करून घेणे आवश्यक आहे. काल बदलतो, तशी परिस्थितीही बदलते. समाजासमोरील, देशासमोरील प्रश्न व आव्हानेही बदलतात. प्राचीन विचारसंचितात त्यांची थेट उत्तरे मिळतीलच असे नाही. त्यामुळे हे ज्ञान व विचारसंचित काळ आणि परिस्थितीनुसार नव्या संदर्भात पुन्हा मांडण्याची गरज आहे. Continuity with change हे त्याचे सूत्र असले तर हे ज्ञान वा विचारविश्व ‘युगानुकूल’ होऊ शकते. हे काम धर्माचार्य, समाजप्रबोधनकार, वैज्ञानिक व विचारवंत यांचे असून त्यांनी ते सातत्याने करीत राहण्याची गरज असते.”

दीनदयाळजींना अभिप्रेत असणाऱ्या ‘देशानुकूल’ व ‘युगानुकूल’ या एकात्म मानव दर्शनातील सूत्रांचा वापर ज्ञान क्षेत्रात केला तर भारतीयांच्या मानासिकतेत – Paradigm shift – वा आमुलाग्र सुयोग्य बदल होऊ शकेल असा विश्वास वाटतो.

1 comment:

  1. We have to implement three language policy - First language - Mother tongue, Second - language National Language or one more Indian language, Third - Foreign language including English. Mother language medium has to be provided up to PHD level for most of the people. Only limited number of people are to be given foreign language medium to facilitate exports and imports of goods as well as services and administrative activities.

    When people have to go for English medium at higher qualification levels, special courses in the language can be provided. There can be a special course on speaking and listening in that language. If some people want special education in foreign languages, they can acquire it through National Open School Correspondence and contact courses during vacations. Thus mother language instruction can be provided to large number of people and small number of persons who want to go abroad can be given additional facilities for learning more languages. There is no need for english medium up to Intermediate or class 12. All post 12 examinations are to be conducted in mother tongue. CBSE/NCERT must produce textbooks in all Indian languages through translations. Question papers also have to be in all Indian languages. Narayana Rao KVSS.

    ReplyDelete