पायढिला समाज – मुळात जाऊन विचार हवा -- दिलीप केळकर

कालच बातमी होती. चार स्त्रियांना यमुना द्रुतगती महामार्गावर गाडीतून उतरवून शेजारच्या शेतात नेऊन त्यांच्यावर सामुहिक बलात्कार करण्यात आला. चालत्या गाडीचे चाक बंदुकीच्या गोळीने आधी निकामी करण्यात आले. सोबत असलेल्या एका पुरुषाला गोळ्या घालून ठार मारण्यात आले. गाडीतील स्त्रियांचे सर्व दागिने हिसकावून घेण्यात आले. त्यानंतर चारी स्त्रियांवर सामुहिक बलात्कार करण्यात आला. त्यातील एक तर १३ वर्षांची मुलगी होती.

खरे पाहता ही काही खूप मोठी खळबळ उडवणारी बातमी नाही. कारण अशा गोष्टी सध्या वारंवार होत आहेत. १०० बातम्यांमधील सामन्यात: ४-५ बातम्या ह्या स्त्रियांवरील अत्याचाराच्या असतात. तरीही काही दूरदर्शन वाहिन्यांनी वरील बातमीचे भरपूर चर्वित चर्वण केले. कारण ती त्यांची गरज आहे. असे केले नाही तर चोवीस तास बातम्या तरी कोणत्या देणार?

आता यमुना द्रुतगती महामार्गावर ठिकठिकाणी पोलीस चौक्या उभ्या करा, सी.सी. टी. व्ही. क्यामेरे लावा इत्यादींसारख्या मागण्या केल्या जातील. शासनाच्या निश्क्रीयतेला शेलक्या शिव्या दिल्या जातील. पण अशा समस्यांच्या मुळाशी जाऊन कोणी विचार करणार नाही. तेवढा वेळही कुठे आहे लोकांना?

काही वर्षांपूर्वीचा एक अनुभव आठवला. दिल्लीला जाण्यासाठी मुंबई सेन्ट्रल स्थानकावर राजधानी गाडीत जाऊन बसलो. थोडा लवकरच गेलो होतो. त्यामुळे डब्यात थोडेच प्रवासी होते. तेवढ्यात एक श्वान पथक डब्यात आले. त्यातील कुत्र्याने त्याचे काम चोखपणे केले. श्वान पथकाच्या मागेमागे एक पोलीस, वही घेऊन माझ्याकडे आला. सुरक्षा व्यवस्थेबद्दल माझे मत मी वहीत लिहावे म्हणून आग्रह करू लागला. मी म्हणालो माझे मत विपरीत आहे. नोंदवू नका. पण डब्याच्या त्या भागात अन्य कोणी नसल्याने त्याने मला गळ घातली. मग मीही मोकळेपणाने माझे मत माडले. ते असे –

१. सदर व्यवस्थेतून सरकारला सुरक्षेसाठी काही तरी करायचे आहे हे दिसून येत आहे. पण सरकार चालवणारे लोक डोके कधी वापरणार? लहान पणी वाचलेल्या वेड्या राजाची गोष्ट थोडक्यात लिहिली. पावसाळ्यातील पाण्याने राजाचे पाय भिजत होते. म्हणून सर्व राज्यातील जमीन चामड्याने आच्छादित करण्याची त्याने आज्ञा दिली होती. एवढे चामडे मिळेना. शेवटी त्याच्या समस्येचे उत्तर एका चाम्भाराने राजाच्या पायाला चामडे बांधून कसे दिले होते त्याची ती गोष्ट होती. ह्या गोष्टीचे तात्पर्य हे होते कि समस्येच्या मुळावर घाव घाला. आतंकवाद्यांशी लढायचे असेल तर आतंकवाद्यांचे अड्डे उध्वस्त करा. आतंकवादी निर्माण करणारी शिक्षण, प्रशिक्षण केंद्रे बंद करा. ते समस्येचे मूळ आहे.

२. दुसरे म्हणजे श्वान पथक येऊन गेल्यानंतर आतंकवादी बॉम्ब ठेवणार नाही ह्याची खात्री कशी देता येईल? कि शासनाचा आणि आतंकवाद्यांचा असा करार झाला आहे कि श्वान पथक येऊन जाण्याच्या आधी फक्त बॉम्ब ठेवायचा. नंतर नाही. आणि शासनाचा आतंकवाद्यांच्या प्रामाणिकतेवरही पक्का विश्वास आहे असे वाटते. म्हणजे ते शासनाला दिलेला शब्द नक्की पाळतील असा शासनाला विश्वास वाटतो.

३. आणि तिसरे म्हणजे श्वान पथकातील कुत्रा प्रामाणिकपणे आपले काम करील. पण त्याच्या बरोबर असणाऱ्या पोलिसांचे काय? ह्याची खात्री वरच्या अधिकाऱ्यांना नसल्यानेच प्रवाशांचे मत लेखी घेण्याची गरज वाटते आहे. ह्या अप्रामाणिकपणाच्या समस्येचे उत्तर काय?

येथे हे देण्याचे कारण हेच आहे कि आम्ही आग सोमेश्वरी आणि बंब सोमेश्वरी असे वागतो आहोत. एका बाजूला पोटासाठी वणवण करावी लागणे व दुस-या बाजूला पाश्चात्यांचे अंधानुकरण यामुळेही स्त्रियांच्या समस्यांत वाढ होत आहे. सध्या सर्व समाजच जणु पायढिला झालेला आहे. कुठल्याही निमित्ताने तो भटकतो आहे. भारतात इंग्रजी राज्यापूर्वी पर्यंत लोक प्रामुख्याने फक्त पुण्यार्जनासाठी आणि ज्ञानार्जनासाठी प्रवास करत असत. आता लोक स्वभावाला अनुकूल अनुरूप काम करत नाहीत. अधिक पैसा मिळवून देणारे जे काम असेल ते काम करतात. त्यासाठी फिरत राहतात. काम स्वभावाला अनुरूप नसल्याने कामाचा बोजा वाटणे साहजिक आहे. कामाचा बोजा वाटला कि शीण येणारच. मग शीण घालवण्यासाठी तो भटकतो. पर्यटन हा एक मोठा धंदा झाला आहे. थोडक्यात काय तर सर्व समाजच पायढिला झाला आहे.

पण ह्या अमर्याद भटकंतीमुळे, पायढिलेपणामुळे आपण अनेक समस्यांना निमंत्रण देत आहोत. पर्यावरणाच्या समस्या, इंधनाच्या समस्या, रस्त्यांवरील अपघातांच्या समस्या, प्राकृतिक संसाधनांच्या दुरुपयोगाच्या समस्या, सुरक्षेच्या समस्या, स्त्रियांवरील अत्याचाराच्या समस्या, चांगले काही करण्यासाठी किंवा अगदी शांत बसून विचार करण्यासाठी सुद्धा वेळ नसण्याची समस्या, जगभरातील सर्वच समाजांच्या संस्कृतींवर अनिष्ट परिणाम होण्याची समस्या – अशा अनेक समस्या ह्या पायढिलेपणातून निर्माण होत आहेत. खेड्यातून अवाढव्य शहरात आलेली व्यक्ती असुरक्षितपणाचा अनुभव करते, तसेच कधी पोटापाण्याची व्यवस्था न झाल्यास शेजा-यांच्या सुहानुभूतीअभावी गुन्हेगारीकडे वळू शकते.

समाजाच्या पायढिलेपणावर समग्र व संतुलित विचार करण्याची वेळ आली आहे. त्याच बरोबर एकंदरच सामाजिक जीवनाच्या प्रतीमानाचाही एकात्म व समग्र दृष्टीतून खोलात जाऊन विचार करणे आवश्यक आहे.

No comments:

Post a Comment