जीएम टेक्नॉलॉजी स्वीकारावी का? -- अनिल जवळेकर

 पर्यावरण मंत्रालयाने मान्य केले तर लवकरच जीएम मस्टार्ड (मोहरी) बाजारात येईल. बीटी कॉटन (कापुस) नंतर भारतात प्रवेश करणारे हे दुसरे व खाद्यपदार्थांपैकी पहिले जीएम पीक असेल. भारतीय पीक नियंत्रकाने तशी शिफारस नुकतीच केली आहे. जीएम तंत्रज्ञानाच्या मूळ संशोधनाला कुणाचा विरोध असण्याचे कारण नाही. संशोधनाच्या परिणामावर व त्याच्या व्यापारी उपयोगावर मात्र शंका घेतल्या जाऊ शकतात. कुठल्याही संशोधनाचा व्यापारी उपयोग होणार हेही आता ठरलेलेच आहे. किंबहुना असेही म्हणता येईल कि व्यापारी उपयोग होईल असेच तंत्रज्ञान विकसित केले जात आहे. व्यापारही तसा वाईट म्हणतां येत नाही. विकासात तर व्यापाराला महत्त्वाचे स्थान आहे. संशोधनाचा विकासात उपयोग झाल्याने मानव जातीचे कल्याण झाले आहे हे नाकारतां येत नाही. समाजात स्वार्थ व नफेखोरी वाढत असल्याने मात्र अशा संशोधनाचा दुरुपयोग होऊ शकतो असे म्हणायला जागा आहे. संशोधनाचा उपयोग मानव जातीच्या हितार्थ होईल अशी खात्री त्यामुळेच देता येत नाही. म्हणूनच संशोधन उपयोगाचा मानव जातीच्या भवितव्यावर काय परीणाम होणारं हा विचार महत्वाचा ठरतो. जेनेटिक बदल घडू शकणारे तंत्रज्ञान असेच एक विचार करायला लावणारे तंत्रज्ञान आहे.

जेनेटिक मॉडीफीकेशन मानव जातीला तसे नवीन म्हणता येणार नाही. निसर्ग सुद्धा अनुवंशिक बदल करत आलेला आहे. निसर्गाच्या मर्यादेत राहून मानवाने आता पर्यंत काही प्रयोग केले आहेत असेही लक्षात येते. शेतीची चांगली उपज व्हावी म्हणून चांगली बीबियाणे राखून ठेवणे त्यातलाच एक प्रयोग म्हणता येईल. चांगली संतती व्हावी म्हणूनही मानवाने काही प्रयोग केले असेही दिसते. जीएम तंत्रज्ञान मात्र निसर्गाच्या बहुतांशी मर्यादा ओलांडत आहे असे दिसते. असे तंत्रज्ञान मानव जातीला भौतिक जीवनात उपयोगी होईल हे मान्य केले तरी मानव जातीचे दीर्घकालीन हित ते कितपत साध्य करेल ह्या बद्दल शंका घेतां येणे शक्य आहे.

आज हे तंत्रज्ञान शेती उत्पादन व उत्पादकता वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपयोगात आणले जात आहे. शेतीची नैसर्गिक पद्धत बदलून त्याजागी एक कृत्रिम शेतीची पद्धती ह्या तंत्रज्ञानाने पुढे आणली आहे. ती स्वीकारलीही जात असल्याचे दिसत आहे. यात वाद-विवाद होत आहेत हे ही खरे आहे. जेनेटिक बदल करून शेतीचे उत्पादन-उत्पादकता वाढवण्याला पाठिंबा मिळत आहे. काही जण ह्याला विरोधही करत आहेत. दोन्ही बाजूला शास्त्रज्ञ व विद्वान आहेत. पाठिंबा दर्शविणारे असे मानतात कि मानव जातीची गरिबी व अन्न धान्य त्रुटी या पासून हे तंत्रज्ञान सुटका करू शकते. कारण येत्या काळात जेव्हा जमिनीची व पाण्याची कमतरता असेल तेव्हा हेच तंत्रज्ञान उपयोगी पडेल. विरोधी हे मान्य करायला तयार नाहीत. त्यांच्या मते ह्या तंत्रज्ञानाच्या उपयोगाने जमिनीची उत्पादनाची नैसर्गिक शक्ती नष्ट होईल व जमीन नापीक होण्याचे प्रमाण वाढेल. तसेच हे तंत्रज्ञान व्यापारा द्वारे नफ्यासाठीची शेती पुरस्कारीत असल्याने लहान शेतकर्‍याचे हित साधले जाणार नाही. शिवाय अशा तंत्रज्ञानाद्वारे उत्पादित अन्न मानव जाती साठी सुरक्षित असणार नाही. ह्या तंत्रज्ञानाच्या उपयोगाने काही नैतिक प्रश्नही उभे राहतील. पाठिंबा देणारे हाही दावा खोटा असल्याचे सांगतात.

एका आकडेवारीवरून भारतात जवळपास ७२ पिका वर हे संशोधन चालू आहे. आज नाही तर उद्या ह्या पैकी बऱ्याच पिकांना व्यापारात आणण्याची परवानगी मिळेल असे मानायला जागा आहे. भारताचा कापसाचा प्रयोग पाहता संशोधनाने केले दावे खरे होत नसल्याचे जाणवते. अमेरिका व चीन जीएम पिकांना स्वीकारत आहेत युरोपीय देश जीएम खाद्यपदार्थांना बंदी घालत आहे. आता बहुतांश देश जीएम अन्न पदार्थावर लेबलींगचा आग्रह धरताना दिसतात कारण त्याच्या सुरक्षीततेची त्यांना खात्री वाटत नाही. उपभोक्ता म्हणूनही सामान्यांच्या दृष्टीने हा प्रश्न महत्त्वाचा आहे कारण शेवटी ह्या प्रयोगाचा आरोग्यावर थेट परिणाम होणार असल्याचे म्हणले जाते. आरोग्यावर होणारे परिणाम दिसायला वेळ लागतो व त्याचाच कदाचित जेनेटिक तंत्रज्ञान प्रसारित करणारे व त्यातून नफा कमावणारे फायदा घेत असतील.

एकात्म व समग्र दृष्टीचा आग्रह धरताना यात महाकाय परदेशी कंपन्यांच्या दबावाखाली आपण येऊ नये. संशोधनाचे परिणाम पूर्णपणे समजल्याशिवाय ते स्वीकारणे मात्र समाजाला वा मानव जातीला महागात पडेल एवढेच या ठिकाणी म्हणावेसे वाटते.

1 comment:

  1. Read your article on G M Technology. VeryThought provoking.

    In my opinion, we must adopt GM technology to enhance food production, because in next 30 years we have to feed more than 160 crores plus population for which we need double the current production. Only G M technology can provide such large output of foodgrains. Of course, we should have strict enforceable scientific protocol for safety and health related issues which may arise due to GM foods. But we have experience of jawar of 1970's produced as gm called as " sankarit jawar".

    Anyway, your article may start a healthy and rational debate to build consensus about G M food.

    Laxmikant Deshmukh IAS,read Pune

    ReplyDelete